सुसगाव परिसरामध्ये वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त

सुसगाव : सुसगाव परिसरातील वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. दररोज होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना कामावर जाण्यासाठी तसेच शालेय मुलांना शाळेवर जाण्यासाठी होत असलेला उशीर यामुळे विद्यार्थ्यांचा मौल्यवान वेळ वाया जात आहे.

सुसगाव परिसरामध्ये अनेकदा बेशिस्त वाहतुकीमुळे वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. विद्या व्हॅली शाळेकडून येणारा रस्ता तसेच सुसगावठाणातून मुख्य रस्त्यावर येणारे रस्ते या रस्त्यांवरील वाहने वळताना वाहतूक कोंडी निर्माण होते. सुस गावातील रस्ता अरुंद असल्यामुळे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो.

हिंजवडी बाणेर मुख्य रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू असल्यामुळे हिंजवडीकडे जाण्यासाठी प्रामुख्याने सुसगाव नांदे रस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणात वाहन चालकांकडून केला जात आहे. यामुळे शाळा सुटण्याच्या वेळेस तसेच ऑफिसेस सुटण्याच्या वेळांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते.

सुसगाव परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात तसेच या परिसरामध्ये बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी सुसगाव परिसरात वाहतूक पोलिस ठेवण्यात यावे अशी मागणी नागरिक करत आहेत.

सुसगाव परिसरातील नागरिक प्रवीण शर्मा, ओंकार सुर्यवंशी यांनी सांगितले, “उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर शाळा सुरू झाल्यापासून, आमच्या भागातील मुले जवळपास दररोज सकाळी वेड्यावाकड्या वाहतुकीमुळे शाळेत वेळेवर पोहोचत नाहीत. आठवड्यातून किमान 2-3 वेळा असे घडत आहे आणि यामुळे मुलांचा शाळेचा मौल्यवान वेळ वाया जात आहे.”

See also  पुणे जनसंसद काँग्रेस भाजपच्या उमेदवारांची दांडी!