भागवत धर्माची पताका उंचावण्याचे काम पत्रकारांनी केले : भैय्यासाहेब पाटील

पंढरपूर – भागवत धर्माचे आद्य प्रचारक म्हणून संत नामदेव महाराजांनी काम केले . त्यांचे कार्य पुढे नेण्याचे व भागवत धर्माची पताका उंचावण्याचे काम वारीच्या माध्यमातून पत्रकारांनी केले आहे . अशा पत्रकारांचा सन्मान करण्याची संधी मुक्ताई संस्थानला प्राप्त झाली आहे असे मत संत मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष ॲड रवींद्र उर्फ भैय्यासाहेब पाटील यांनी व्यक्त केले .
संत मुक्ताबाई संस्थान मुक्ताईनगरच्या वतीने कै प्रल्हादराव पाटील यांच्या स्मरणार्थ सन २०१९ पासून पत्रकारिता क्षेत्रात भागवत धर्माचा प्रचार व प्रसार करणाऱ्या पत्रकारांना ” भागवत धर्म प्रचारक ” हा पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येते . यापूर्वी हा पुरस्कार सूर्यकांत भिसे (वेळापूर ) व शंकर टेमघरे ( पुणे ) यांना देण्यात आला असल्याचे ह भ प रवींद्र महाराज हरणे यांनी सांगितले . यंदाचा पुरस्कार पुणे जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष मनोज मांढरे ( सासवड ) यांना देण्यात आला . वारकरी फेटा , उपरणे , श्रीफळ व श्री विठ्ठलाची मूर्ती असे या पुरस्काराचे स्वरुप असल्याचे ते म्हणाले .
मांढरे म्हणाले , १९९३ पासून प्रेसफोटोग्राफर म्हणून वृत्तपत्र क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली . वारीचे फोटो वृत्तपत्रांत प्रसिध्द होत राहिले . त्यामुळे आवड निर्माण झाली व त्यातून भागवत धर्माचा प्रचार प्रसार होत गेला . संत नामदेव महाराज घुमान सायकल यात्रेने त्यावर कळस चढविला .
या पुरस्कार वितरण सोहळ्यास संस्थानचे विश्वस्थ गजानन पाटील , पंजाबराव पाटील , कन्हैया महाराज , भागवत धर्म प्रसारक समितीचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे , उपाध्यक्ष शंकर टेमघरे , सचिव ॲड विलास काटे , कवी दशरथ यादव , राजेंद्रकृष्ण कापसे आदी उपस्थित होते .

See also  महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनांसाठी विशेष शिबिरे आयोजित करावी – राष्ट्रीय सफाई कामगार आयोगाचे अध्यक्ष एम वेंकटेशन