विजयस्तंभ अभिवादन सोहळा सर्व विभागांनी समन्वयाने काम करुन यशस्वी करावा- जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

पुणे : पेरणे फाटा येथे १ जानेवारी रोजी आयोजित करण्यात येणारा विजयस्तंभ अभिवादन सोहळा शांतता आणि उत्साहात साजरा व्हावा यादृष्टीने वाहतूक, पार्किंग, वाहनव्यवस्था आदींचे चोख नियोजन करावे. अनुयायांना आवश्यक त्या सोयीसुविधा पुरवण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण आदी उपस्थित होते.

डॉ.देशमुख म्हणाले, गतवर्षीच्या अनुयायांच्या तुलनेत यावर्षी आणखी मोठ्या प्रमाणात भाविक येण्याची शक्यता असून त्यादृष्टीने सर्व बाबींचे सूक्ष्म नियोजन करावे. यापूर्वीचे अनुभव लक्षात घेता अनुयायांसाठी बसेसची व्यवस्था, वाहतूकीचे नियोजन, वाहनतळांची व्यवस्था आदींचे चोख नियोजन करण्यात यावे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांची डागडुजी करून घ्यावी, अशाही सूचना त्यांनी दिल्या.

गतवेळी पीएमपीएमएलने सोहळ्यासाठी आवश्यक संख्येने नव्या बसेस दिल्या होत्या. यावर्षीही अधिक आणि सुस्थितीतील बसेसची व्यवस्था करावी. बसेससाठी राखीव वाहनचालक असावेत. पोलीस विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने स्थळपाहणी करुन वाहनतळ निश्चित करावेत. प्रकाशव्यवस्था अखंडित राहील यासाठी विजयस्तंभ परिसर, वाहनतळाच्या ठिकाणी जेनसेटची व्यवस्था करावी, जिल्हाधिकारी म्हणाले.

*कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व विभागांनी माहितीचे आदानप्रदान करावे- पोलीस आयुक्त*
पोलीस आयुक्त रितेश कुमार म्हणाले, पोलीस विभागाकडून गतवर्षीपेक्षा अधिक बंदोबस्त या सोहळ्यासाठी ठेवण्यात येणार आहे. विजयस्तंभ परिसराच्या प्रवेशाच्या ठिकाणी (एन्ट्री पॉईंट) अधिक चांगली व्यवस्था करण्याचे नियोजन आहे. यावर्षी ड्रोनच्या मदतीने लक्ष ठेवण्याचे नियोजन आहे. या ठिकाणी कायमस्वरुपी सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचा प्रस्ताव द्यावा. चोख कायदा व सुव्यवस्था राखण्याचे पोलीसांचे लक्ष्य आहे. त्यादृष्टीने सर्व विभागांनी पोलीस विभागाशी समन्वयाने माहितीचे आदानप्रदान करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. चव्हाण यांनी पिण्याचे पाणी, मोबाईल शौचालये, पुरेशा औषधांसह आरोग्य पथके, रस्त्यांची डागडुजी आदी व्यवस्था करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले.

यावेळी विजयस्तंभ परिसराचे सुशोभिकरण, प्रकाशव्यवस्था, स्टॉल, मंडप उभारणी, वाहनतळ, वाहतूक आराखडा, आरोग्य तपासणी, पिण्याचे पाणी, रस्त्यांची दुरुस्ती, तात्पुरेत शौचालय उभारणी, स्वच्छतेसाठी घंटागाड्या, आपत्तकालीन प्रसंगी अग्नीशमन वाहनांची व्यवस्था, विजयस्तंभाशेजारी नदी असल्यामुळे एनडीआरएफ तुकडी नेमणे, आपत्तीव्यवस्थापन विभागाकडून बोटीची व्यवस्था आदींबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.

बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, परिमंडळ २ च्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, समाजकल्याणचे प्रादेशिक उपायुक्त बी. ए. सोळंकी यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे महानगरपालिका तसेच पीएमआरडीए, अग्नीशमन विभाग, एनडीआरएफ, शिरुर तसेच हवेलीचे गटविकास अधिकारी, पोलीस विभाग, परिवहन, पीएमपीएमएल, आरोग्य विभाग, राज्य उत्पादन शुल्क आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

See also  स्वच्छ भारत अभियानाला लोकचळवळीचे स्वरुप-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील