‘क्रिएटिव्ह इंजिन एक्स्पो २०२६’मधून उलगडणार भारताच्या ‘ऑरेंज इकॉनॉमी’चे भवितव्य

पुणे : बदलत्या जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये आता पारंपरिक उद्योगांच्या जोडीला सर्जनशीलता, कल्पनाशक्ती आणि डिजिटल कौशल्य यांना मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. मानवी मेंदूतील कल्पनाशक्तीवर आधारित ‘ऑरेंज इकॉनॉमी’ अथवा ‘क्रिएटिव्ह इकॉनॉमी’ ही भारताच्या आर्थिक प्रगतीची नवी दिशा ठरत असून त्याच संकल्पनेवर आधारित ‘क्रिएटिव्ह इंजिन एक्स्पो २०२६’चे आयोजन येत्या ३० आणि ३१ मे रोजी गणेश कला क्रीडा मंच,पुणे येथे करण्यात आले आहे. अशी माहिती मुख्य आयोजक सृजन कॉलेज ऑफ डिझाईन चे संस्थापक संतोष रासकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

पुणे श्रमिक पत्रकार भवन येथे झालेल्या परिषदेला  आयआयसीटीचे संचालक आशिष कुलकर्णी, प्रशांत महाडीक – डायरेक्टर, शारदा बिज़नेस सोल्यूशन प्रा लि.,  निखिल हळ्ळी डायरेक्टर अरेना,  विनीता बच्छानी – डायरेक्टर मोशन पिक्चर्स स्कूल आदी मान्यवर उपस्थित होते. 

एक्स्पो विषयी अधिक माहिती देताना संतोष रासकर म्हणाले, हा एक्स्पो केवळ कला, ॲनिमेशन किंवा तंत्रज्ञानाचा मेळावा नसून भारतातील भविष्यातील अब्जावधी रुपयांच्या क्रिएटिव्ह अर्थकारणाची झलक ठरणार आहे. असल्याचे आयोजकांनी सांगितले . जगभरात वेगाने वाढणाऱ्या डिजिटल आणि क्रिएटिव्ह क्षेत्रामुळे रोजगार, गुंतवणूक आणि आर्थिक विकासासाठी नवे मार्ग खुले होत आहेत. यामुळे भारतासारख्या विकसनशील देशाला जागतिक स्तरावर मोठी संधी निर्माण झाली आहे.

सध्या जागतिक स्तरावर ‘ऑरेंज इकॉनॉमी’चा वाटा GDP मध्ये सातत्याने वाढत असून ॲनिमेशन, गेमिंग, VFX, डिजिटल डिझाईन, व्हर्च्युअल रिअॅलिटी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित क्रिएटिव्ह सोल्यूशन्स यांसारख्या क्षेत्रांमध्ये मोठी आर्थिक उलाढाल होत आहे. केंद्र सरकारनेही डिजिटल आर्ट आणि क्रिएटिव्ह इंडस्ट्रीला राष्ट्रीय आर्थिक प्रगतीचा महत्त्वपूर्ण घटक म्हणून मान्यता दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला जागतिक ‘क्रिएटिव्ह इकॉनॉमी’चे केंद्र बनवण्याचे व्हिजन मांडले असून त्यासाठी विविध धोरणात्मक पावले उचलली जात आहेत. आयआयसीटी चे डायरेक्टर आशीष कुलकर्णी यांनी ही माहिती दिली.

महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेला ‘पुणे-मुंबई AVGC-XR कॉरिडॉर’ हा या क्षेत्रातील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. AVGC-XR म्हणजे Animation, Visual Effects, Gaming, Comics आणि Extended Reality या क्षेत्रांचा समावेश असलेला हा कॉरिडॉर पुणे आणि मुंबई या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडून सर्जनशील उद्योगांचे नवे केंद्र निर्माण करणार आहे. शिक्षण, संस्कृती आणि तंत्रज्ञानाचा मजबूत पाया असलेल्या पुणे शहराला यामुळे देशाचे ‘क्रिएटिव्ह कॅपिटल’ बनण्याची मोठी संधी मिळणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

See also  छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघ समस्या आणि विकासकामे मार्गी लावण्याबाबत आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचे आयुक्तांसोबत बैठक

या एक्स्पोमध्ये देश-विदेशातील सुमारे ३५ नामांकित कंपन्या आणि स्टुडिओ सहभागी होणार आहेत. यात असेंबलाज स्टुडिओ, रिलायन्स ॲनिमेशन स्टुडिओ, रेड चिलीज VFX, एनव्हिजन स्टुडिओ, कंपनी 3, NY VFXWala, निली गेम्स, गेमडोरा, रॅम्पन्ट स्टुडिओ, हायटेक, डब्ल्युआरसी, विजडम ग्राफिक्स यांसारख्या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्या केवळ मनोरंजन क्षेत्रापुरत्या मर्यादित नसून सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, ई-कॉमर्स, आर्किटेक्चरल व्हिज्युअलायझेशन, वैद्यकीय 3D सिम्युलेशन, डिजिटल मार्केटिंग आणि सायबर सुरक्षेसारख्या क्षेत्रांमध्येही कार्यरत आहेत.

ऑरेंज इकॉनॉमीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या क्षेत्रासाठी मोठ्या भांडवलाची किंवा प्रचंड जागेची आवश्यकता नसते. एक संगणक, इंटरनेट आणि सर्जनशील विचार यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील युवक देखील जागतिक स्तरावर काम करू शकतो. त्यामुळे हे क्षेत्र समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याची क्षमता ठेवते. महिलांचा वाढता सहभाग, स्टार्टअप संस्कृतीला मिळणारे प्रोत्साहन आणि डिजिटल माध्यमातून निर्माण होणाऱ्या नव्या रोजगार संधी यामुळे क्रिएटिव्ह इकॉनॉमी सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम ठरणार असल्याचे मत भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष आणि माजी खासदार प्रदीप रावत यांनी व्यक्त केले.

आज ऑनलाईन शिक्षण, मोबाईल ॲप्लिकेशन्स, गेमिंग, व्हर्च्युअल टूर, वैद्यकीय शस्त्रक्रियांचे 3D सिम्युलेशन, डिजिटल जाहिरात, सोशल मीडिया कंटेंट आणि OTT प्लॅटफॉर्म यांसारख्या गोष्टी सामान्य नागरिकांच्या जीवनाचा भाग बनल्या आहेत. अगदी Uber, Swiggy आणि Zomato यांसारख्या सेवा देखील या नव्या डिजिटल अर्थव्यवस्थेचेच उदाहरण असल्याचे संतोष रासकर यांनी स्पष्ट केले.

भारतातील पुढील पिढी कोणत्या नव्या डिजिटल आणि सर्जनशील जगात प्रवेश करणार आहे, देशाच्या अर्थव्यवस्थेला कोणती नवी दिशा मिळणार आहे आणि कल्पनाशक्तीच्या जोरावर भारत महासत्तेकडे कसा वाटचाल करत आहे, याची प्रत्यक्ष अनुभूती देणारा हा एक्स्पो ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. प्रवेश विनामूल्य असून नागरिक, विद्यार्थी, उद्योजक, कलाकार, डिझायनर्स आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिकांनी या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.