ऋषीपंचमीनिमित्त दगडूशेठ गणपती समोर ३५ हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण

पुणे : ओम नमस्ते गणपतये… मोरया, मोरया… आणि ओम गं गणपतये नमः … च्या जयघोषाने ॠषीपंचमी निमित्त आयोजित सोहळ्यात उर्जेने भारलेल्या वातावरणामध्ये हजारो महिलांच्या गर्दीचा उच्चांक पाहायला मिळाला. तब्बल ३५ हजार पेक्षा जास्त महिलांनी एकत्र येत अथर्वशीर्ष पठणातून गणरायाला नमन केले. गणेश नामाचा जयघोष, अथर्वशीर्ष आणि महाआरतीने संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते.

निमित्त होते, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १३४ व्या वर्षीच्या गणेशोत्सवात उत्सव मंडपासमोर आयोजित अथर्वशीर्ष पठण सोहळ्याचे. यावेळी ॠषिपंचमीनिमित्त ३५ हजार महिलांचे अर्थवशीर्ष पठण गणेशोत्सवातील प्रेम मंदिराच्या प्रतिकृती समोर पार पडले.

पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, विभागीय आयुक्त शीतल तेली – उगले, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, शुभांगी भालेराव, अर्चना भालेराव, सुवर्णयुग तरुण मंडळाचे सौरभ रायकर, यतिश रासने, मंगेश सूर्यवंशी, राजाभाऊ घोडके, सचिन आखाडे, अंकुश रासने यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. पावसाचे वातावरण असले तरी पारंपरिक वेशात मध्यरात्री २ वाजल्यापासून महिलांनी या उपक्रमाकरीता हजेरी लावण्यास सुरुवात केली. उपक्रमाचे ४१ वे वर्ष होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला महिलांनी शंखनाद केल्यानंतर सोहळ्याला प्रारंभ झाला. त्यानंतर मन शांत करणारा ओंकार जप, गणराजा गणनायका…मोरया रे बाप्पा मोरया रे… या गणेशगीताच्या सादरीकरणाने वातावरण मंत्रमुग्ध झाले. महिलांनी मुख्य अथर्वशीर्ष पठण करीत गणरायाला नमन केले. मोरया मोरया दगडूशेठ मोरया… असा गणेश नामाचा गजर करताना प्रत्येक महिलेच्या चेह-यावरील उत्साह ओसंडून वाहत होता. दगडूशेठच्या उत्सव मंडपापासून ते नाना वाडयापर्यंतच्या परिसरात महिलांनी अथर्वशीर्ष पठणाकरीता गर्दी केली. भक्तीरसात तल्लीन झालेल्या वातावरणात कार्यक्रमाची सांगता आरतीने झाली.

महापौर मंजुषा नागपुरे, उत्सवात महिला तयार होऊन येते किंवा उत्सवाची तयारी करते तेव्हाच तो उत्सव पूर्ण होतो. संपूर्ण पुणे शहराकरीता शक्ती आणि ऊर्जा या माध्यमातून निर्माण झाली आहे.

See also  बाणेर मध्ये महाबळेश्वर हॉटेल जवळील 45 एव्हेन्यू बिल्डिंग जवळ गोळीबार एक जखमी

महिला हात उंचावून टाळ्यांचा गजर करीत गणरायाला नमन करीत होत्या. मुंबई, सातारा, कोल्हापूर, लातूर आदी शहरातून महिला या उपक्रमासाठी आल्या होत्या. अर्चना भालेराव, प्रा. डॉ. गौरी कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.