क्षयरोगमुक्त भारत अभियानासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करावे- डॉ. तानाजी सावंत

पुणे : क्षयरोग मुक्त भारत अभियानासाठी क्षयरोग प्रशिक्षकांचे प्रशिक्षण महत्त्वाचे असून अधिकाधिक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण कार्यक्रमात सामावून घ्यावे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी राष्ट्रीय क्षयरोग प्रशिक्षकांकरीता पहिल्या प्रशिक्षण वर्गाचा शुभारंभाप्रसंगी केले.

औंध येथील राज्य क्षयरोग नियंत्रण व प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण वर्गाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी केंद्र शासनाचे अतिरिक्त उपसंचालक डॉ. संजयकुमार मट्टू, सहसंचालक (क्षय व कुष्ठरोग) डॉ. सुनिता गोल्हाईत, उपसंचालक डॉ. राधाकिसन पवार, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ. संदिप सांगळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ येमपल्ले, क्षयरोग नियंत्रण व प्रशिक्षण केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिरुद्ध देशपांडे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. संजय दराडे आदी उपस्थित होते.

आरोग्य मंत्री डॉ. सावंत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२५ पर्यत क्षयरोग मुक्त भारत अभियानासाठी अशा पद्धतीचे प्रशिक्षण अतिशय महत्त्वाचे आहे. क्षयरोग निर्मुलनासाठी सर्व माहिती असलेले क्षयरोग प्रशिक्षक तयार होणे गरजेचे आहे. त्यामुळे अशा प्रकारचे प्रशिक्षण अधिकाधिक कर्मचाऱ्यांना देऊन राज्यासह देश क्षयरोग मुक्त करण्याचा करण्यासाठी प्रयत्न करावे, असेही ते म्हणाले.

डॉ. मट्टु म्हणाले, क्षयरोग प्रशिक्षणासाठी देशातील अग्रगण्य संस्थांची निवड करण्यात आली आहे. देशात सध्या पाच क्षयरोग प्रशिक्षण केंद्र असून, त्यात पुण्यातील क्षयरोग नियंत्रण व प्रशिक्षण केंद्राचा समावेश आहे. या प्रशिक्षण वर्गासाठी वेगवेळ्या ९ राज्यातून प्रशिक्षणार्थी सहभागी झाले आहेत, असेही ते म्हणाले.

See also  उमरजी मदर अँड चाइल्ड केअर हॉस्पिटलमध्ये गर्भ उपचार कार्यशाळा 2024 यशस्वीपणे संपन्न