खासदार सुप्रिया सुळे यांची पुणे महानगरपालिका आयुक्त डाॅ. राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा

पुणे : पुणे शहरामध्ये पहिल्याच पावसात पुणेकरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन पुणे महानगरपालिका आयुक्त डाॅ. राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष महादेव कोंढरे, खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष सोपान काका चव्हाण, खडकवासला ग्रामीणचे अध्यक्ष त्रिंबक अण्णा मोकाशी, माजी नगरसेवक विशाल तांबे, सचिन दोडके, आश्विनी कदम, शंकरनाना हरपळे, नमीश बाबर, किशोर कांबळे, पूजा परागे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

पावसाची अद्याप सुरुवात होणार असताना पहिल्याच पावसाने महापालिका प्रशासनाच्या कामांतील त्रुटी समोर आल्या आहेत. पहिल्याच पावसात शहरात बहुतेक सर्व भागांत एक-दीड तास धुव्वाधार पाऊस झाला. या पावसामुळे शहरातील बहुतेक सर्व रस्त्यांवर पाणी-पाणी झाले, नाल्यांमधून पाणी वाहून न गेल्याने चौकाचौकांत पाण्याची तळी साठली होती. रस्त्यावरून वाहने वाहून जातानाचे व्हिडिओ प्रसारमाध्यमातून प्रसारित झाले होते. तर काही भागांत घरांमध्येदेखील पाणी शिरले होते. पूर्ण पुणे शहरच जलमय झाल्याचे दिसून आले. पुणे महापालिका प्रशासनाकडून दरवर्षी संपूर्ण शहरामध्ये पावसाळीपूर्व कामे केली जातात. यामध्ये ओढे- नाले, ड्रेनेज सफाई, रस्त्यावरील पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांमधील गाळ, कचरा काढणे, रस्ते, फुटपाथ दुरुस्ती आदी विविध स्वरूपाची कामे केली जाणे अपेक्षित आहे. परंतु, दरवर्षीप्रमाणे यंदाही महापालिकेची पावसाळापूर्व कामे होऊ न शकल्यामुळे त्याचे दुष्परिणाम सामान्य नागरिकांना सोसावे लागत आहेत. शहरातील  शिवाजीनगर, सिंहगड रस्ता, वडगाव पूल परिसर, कात्रज चौक, आंबेगाव, धनकवडी, पर्वती परिसर, नीलायम थिएटर, फर्ग्युसन रस्ता, अलका टॉकीज चौक, कोथरूड, भांडारकर रस्ता, कॅम्प परिसर, कर्वे पुतळा चौक, लॉ कॉलेज रस्ता, घोले रोड, मार्केट यार्ड, जंगलीमहाराज रस्ता, नळस्टॉप, वडगाव शेरी, धानोरी आदी सर्वच भागात पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. पाणी वाहून नेणाऱ्या नाल्याची योग्य सफाई न झाल्याने रस्त्यांवरून वाहनारे पाणी चौकांमध्ये येऊन येथे मोठे तळी निर्माण झाल्याचे चित्र सर्वत्र पाहिला मिळाले. शहरातील अनेक मोठ्या रस्त्यांवर पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी आवश्यक असलेल्या पावसाळी गटाराची सुविधाच नसल्याचे समोर आले आहे. यामुळे पावसाचे पाणी रस्त्यांवरूनच वाहत असल्याने सर्व रस्ते जलमय झाले होते.
तरी पावसामुळे होणारे दुष्परिणाम, दुर्घटना, आर्थिक नुकसान व नागरिकांना होणार त्रास टाळण्यासाठी तातडीने आवश्यक त्या उपाय योजना करण्यात याव्यात अशी आग्रही मागणी आयुक्तांकडे करण्यात आली. आयुक्तांनीही या संदर्भात सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

See also  ह.भ.प ज्योतीभाऊ विश्वनाथ थोरवे यांचे निधन