‘परिवर्तन महाशक्ती’ ची घोषणा, राज्याच्या राजकारणाला नवीन सुसंस्कृत पर्याय देण्यासाठी समविचारी नेते एकत्र

पुणे  : आगामी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राजकारणामध्ये नवीन सक्षम पर्याय देण्याची घोषणा छत्रपती संभाजीराजे, राजू शेट्टी, बच्चू कडू, शंकरअण्णा धोंडगे, वामनराव चटप, नारायण अंकुशे यांनी एकत्रितपणे केली. व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस येथे झालेल्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ‘परिवर्तन महाशक्ती’ ची घोषणा करण्यात आली.

स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे म्हटले की, ‘महाराष्ट्रातील जनता अस्वस्थ झालेली असून त्यांना सक्षम व सुसंस्कृत पर्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे. राज्यातील सध्याचे राजकारण पाहता, पुर्वी मोठ्या गावांना बुद्रुक व छोट्या गावांना खुर्द म्हटले जायचे तशीच शिवसेना व राष्ट्रवादी ची अवस्था झालेली आहे.’

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी म्हटले की,’ महाराष्ट्राच्या राजकारणाचा सातबारा कोणत्याही पक्षाच्या नावावर केलेला नाही, ‘परिवर्तन महाशक्ती’ चे नेतृत्व सामूहिक असेल.’

प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू बोलताना म्हटले की, ‘आमच्या जवळ विचारांचा व मुद्द्यांचा अजेंडा आहे, ज्या पक्षांना व संघटनांना आमच्या परिवर्तन महाशक्ती मध्ये सहभागी होयचे असेल त्यांच्यासाठी आमचे दालन उघडे असेल.’

महाराष्ट्र राष्ट्र समितीचे शंकरअण्णा धोंडगे म्हटले की, ‘महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा लक्षात घेता, प्रस्थापित आघाड्यांना एक आश्वासक पर्याय देण्याचा निर्णय व निश्चय आजच्या बैठकीत झाला. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अत्यंत चांगले काम करून दाखवतील असा विश्वास आहे.’

स्वतंत्र भारत पक्षाचे वामनराव चटप यांनी सांगितले की,’ येत्या २६ सप्टेंबर रोजी परिवर्तन महाशक्ती च्या सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांचा एकत्रित मेळावा छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आला आहे. तसेच परिवर्तन महाशक्ती मध्ये विविध विषयांवर निर्णय घेण्यासाठी सुकाणू समिती स्थापन करण्यात येणार आहे.’

यावेळी स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव, अंकुश कदम, माधव देवसरकर यांच्यासह सर्व पक्षांचे प्रमुख नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

See also  अर्थतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 'द प्रॉब्लेम ऑफ रुपी' या ग्रंथ प्रदर्शनास अभुतपूर्व प्रतिसाद