पिंपरी : अभियांत्रिकीचे तांत्रिक शिक्षण मातृभाषेतून देण्याचा क्रांतिकारी निर्णय एआयसीटीने २०२० मध्ये घेतला. सध्या देशातील दहा राज्यांमध्ये हा उपक्रम सुरू आहे. मराठी भाषेतून अभियांत्रिकी शिक्षण देणारे पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पीसीसीओई हे देशातील एकमेव महाविद्यालय आहे. या पदवी अभ्यासक्रमादरम्यान एकही विद्यार्थी शिक्षण अर्धवट सोडून बाहेर गेला नाही, ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. पदवी प्राप्त ७५ टक्के विद्यार्थ्यांना रोजगार संधी प्राप्त झाल्या आहेत. हे कौतुकास्पद असून ‘एआयसीटी’ने २०२० मध्ये प्रादेशिक भाषेतून उच्च शिक्षण देण्याचा घेतलेला निर्णय शिक्षण क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरला आहे. हे अधोरेखित होत आहे, असे मत एआयसीटीचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचालित निगडी येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या (पीसीसीओई) प्रादेशिक भाषेतून संगणक अभियांत्रिकीच्या पहिल्या तुकडीचा पदवी प्रदान समारंभ ‘अश्वमेध २०२५’ शनिवारी (३१ मे) आयोजित करण्यात आला होता. यावेळी पीसीईटीचे विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, एटीएक्सचे सीईओ अशोक गवळी, पीसीसीओईचे संचालक व पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. गोविंद कुलकर्णी, संगणक अभियांत्रिकीच्या विभाग प्रमुख डॉ. रचना पाटील, राहुल कुलकर्णी विविध विद्याशाखेचे प्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.
तांत्रिक ज्ञान प्रादेशिक भाषेमध्ये रूपांतरित करण्यास कृत्रिम बुद्धिमत्ता, प्रज्ञा यांचा उपयोग महत्त्वाचा आहे. त्यामुळे नवीन माहिती संकलित करणे, कौशल्य विकसित करणे यासाठी उपयुक्त आहे. येत्या पाच वर्षांत संगणक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बदल होतील. भारतातील युवकसंख्या एक-पंचमांश आहे. आपला देश आज चौथ्या क्रमांकावर आहे. जपान, चीन, फ्रान्स या देशांनी आपापल्या मातृभाषेतून शिक्षण घेतले आणि स्वतःची उत्पादने निर्माण केली. आपणही मराठीतून शिक्षण घेऊन तशी उत्पादने तयार करू शकतो, असे डॉ. सहस्रबुद्धे म्हणाले.
पीसीयू चे कुलपती हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले की, एनइपीने (नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण) धोरण तयार करताना प्रादेशिक भाषा वापरण्यास स्वायत्तता दिली आहे. प्रादेशिक भाषेतून शिक्षण, महत्त्व आणि उपयोग यापुढील काळात ठळकपणे दिसून येईल. पीसीसीओईचे संचालक, संगणक विभागप्रमुख, प्राध्यापकांनी मराठी भाषेतून अभियांत्रिकी शिक्षण देण्यासाठी भरपूर कष्ट घेतले. विद्यार्थी, पालकांशी संवाद साधत अडचणी दूर केल्या. आज ६७ विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी पदवी प्राप्त केली याचा अभिमान आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच क्रीडा, साहित्य यामध्ये प्रगती केली पाहिजे. आपले आई-वडील व जेथे शिक्षण घेतले त्या संस्थेला विसरू नका असे हर्षवर्धन पाटील म्हणाले.
संगणकीय प्रणाली मराठी भाषेतून तयार झाली पाहिजे. तरच मराठी भाषा खऱ्या अर्थाने ज्ञान भाषा होईल, असे डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी सांगितले.यावेळी विद्यार्थी देवाशिष गायकवाड, जयती वाजिरे, पालक राजेंद्र पाठक, उद्योजक प्रतिनिधी एटीएक्सचे सीईओ अशोक गवळी यांनी मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचालन प्रा. अश्विनी वझे, डॉ. सुजाता कोल्हे यांनी, प्रास्ताविक डॉ. रचना पाटील यांनी केले. आभार प्रा. संजिवन भोईटे यांनी मानले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी पदवी प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.