मुळशी मध्ये ज्येष्ठ इतिहास संशोधक व विचारवंत डॉ. जयसिंगराव पवार आणि डॉ. आ. ह. साळुंखे यांना ‘शिवस्वराज्यभूषण पुरस्कारा’ने शरद पवार यांच्या हस्ते देऊन सन्मान

पुणे : पुण्याच्या मुळशी येथे ‘सह्याद्री प्रतिष्ठान’च्या वतीने आयोजित ‘शिवस्वराज्यभूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात’ ज्येष्ठ इतिहास संशोधक व विचारवंत डॉ. जयसिंगराव पवार आणि डॉ. आ. ह. साळुंखे यांना खासदार शरद पवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्राचे ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि विचारवंत डॉ. जयसिंगराव पवार, सौ. पवार, दुसरे ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे, विलास पवार, खासदार सुप्रियाताई सुळे, जगन्नाथ बापू शेवाळे, श्रीमंत कोकाटे, प्रशांत जगताप, प्रवीण गायकवाड, सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल पवार आणि उपस्थित होते.

खासदार शरद पवार म्हणाले, महाराष्ट्राच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचं योगदान ज्यांनी दिलं आणि वास्तव इतिहास हा लोकांसमोर ठेवला, अशा दोन विचारवंतांचा सन्मान आज या ठिकाणी होतोय. तो सन्मान ‘शिवस्वराज्यभूषण’ हा पुरस्कार देऊन होतोय. ज्यांचा आपण सत्कार केला, त्या दोन्ही सत्कारमूर्ती एका दृष्टीने एकेकाळी सातारा जिल्हा म्हणून ओळखला जायचा त्या जिल्ह्यात यांचा जन्म झालेला होता. आजच्या काळामध्ये त्याचा उल्लेख सांगली म्हणून केला जातो. पण हा खऱ्या अर्थाने एका कालखंडामध्ये सातारा जिल्हा होता. सातारा जिल्हा हा महाराष्ट्राच्या इतिहास निर्मितीमध्ये अत्यंत मोलाची कामगिरी करणारा हा जिल्हा आहे. मग तो शिवछत्रपतींचा कालखंड असो किंवा स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये ब्रिटिशांच्या विरुद्ध संघर्ष करणारा कालखंड असो. अशा भूमीमध्ये ज्यांचा जन्म झाला या दोघांनी महाराष्ट्राचा खरा इतिहास जनतेसमोर मांडण्यासाठी प्रचंड योगदान दिलं. इतिहास हा सबंध जर बघितला तर या इतिहासाची मोडतोड करणं, ही भूमिका काही तथाकथित विचारवंतांनी केली. त्याचं वास्तव चित्र हा लोकांसमोर मांडला. त्या भावनेने जे काही प्रयत्न झाले त्या प्रयत्नांमध्ये डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. आ. ह. साळुंखे यांचा फार मोठा वाटा आहे. शिवछत्रपतींचा विचार आज खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांसमोर आला.

या देशामध्ये राजे- राजवाडे अनेक होऊन गेले. अनेकांची राज्य आली. दिल्लीच्या तख्तावर मोघलांचं राज्य होतं, कुठे कुतुबशाही होती, कुठे निजामशाही होती, कुठे देवगिरीच्या यादवांचं राज्य होतं. पण शिवछत्रपतींचं राज्य हे भोसल्यांचं राज्य म्हणून कधीही ओळखलं गेलं नाही. हे रयतेचं राज्य आहे, हे हिंदवी स्वराज्य आहे. म्हणून रयतेला संघटित करून व त्यांचा आत्मविश्वास जागा करून त्यांच्यासाठी आणि त्यांचं राज्य उभं करण्यासंबंधीचा इतिहास हा शिवछत्रपतींनी केला. म्हणून शिवछत्रपती यांच्याकडे बघण्याचा तुमचा- माझा सगळ्यांचा दृष्टिकोन एक युगपुरुष म्हणून आहे. तोच वास्तव इतिहास आज या ठिकाणी ज्यांचा सन्मान केला त्या महामूर्तींनी मांडलेला आहे.

See also  महार रेजिमेंटच्या मुख्यालयामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोस्ट कार्ड पाठविण्याच्या अभियानाची सुरुवात

यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व मुळशी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.