केंद्रीय अर्थसंकल्पात पुणेकरांसाठी निव्वळ घोषणाबाजी -माजी आमदार मोहन जोशी

पुणे : मोदी सरकारच्या अंदाजपत्रकात पुणेकरांसाठी नुसती घोषणाबाजी आणि स्वप्नरंजन करण्यात आल्याची टीका माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी आज पत्रकाद्वारे केली आहे.

भाजप नेत्यांनी पुणे-मुंबई आणि पुणे-हैदराबाद हायस्पीड रेल्वे योजनांबद्दल निव्वळ गाजावाजा चालवला आहे. या योजना पूर्ण कधी होणार? पुणेकरांना त्याचा फायदा कधी मिळणार? यात काहीच स्पष्टता नाही, त्यामुळे पुण्याचा जीडिपी वाढेल, आर्थिक उलाढाल वाढेल याबद्दलचे दावेही दिशाभूल करणारे ठरतात. ग्रोथ हबसाठी केलेल्या तरतुदीतून पुण्याला पाच वर्षात फायदा होईल, या दाव्यातही तथ्य नाही. केवळ भूलभुलैया आहे, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

मोदी सरकार सातत्याने घोषणाबाजी करण्यासाठी प्रसिद्ध आहे. पुण्याच्या विकासाची भाषा हा त्यातलाच एक भाग आहे. पुणे शहर हे देशातील महानगर म्हणून आकाराला आलेले आहे. त्याच्या पायाभूत सुविधांसाठी, येथील वाहतुकीचे प्रश्न सोडविण्यासाठी मोठ्या तरतुदींची आणि कालबद्ध कार्यक्रमाची आवश्यकता आहे. त्याबाबत मोदी सरकारकडून निराशाच झाली. फसलेली स्मार्ट सिटी योजना हा त्याचा पुरावा आहे. पुणेकर मतदारांनी भाजपला भरभरून दिले, त्या तुलनेत मोदी सरकारने येथील मध्यमवर्गीयांची निराशाच केलेली आहे, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

See also  कोथरूड मतदार संघात काँग्रेसचा घरेलू कामगार मेळावा