जिल्ह्यात लोकसहभागातून 1200 वनराई बंधारे पूर्ण

पुणे : जिल्ह्यात लोकसहभाग आणि श्रमदानातून वनराई बंधारे बांधण्याची मोहीम राबविण्यात येत असून जिल्ह्यातील विविध विभागामार्फत आतापर्यंत 1 हजार 200 वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत.

पावसाची अनियमितता आणि त्यातील खंड यामुळे काही तालुक्यात पाणी टंचाईला सामारे जावे लागत आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याअनुषांगाने जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वनराई बंधारे बांधण्याची मोहीम कृषी व अन्य विभागामार्फत राबविण्यात येत आहे.

या मोहिमेत अधिकारी, कर्मचारी, शाळा, महाविद्यालये, सेवाभावी संस्था, व्यापारी मंडळे, गणेश मंडळे, महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, कृषी सेवा केंद्र, लोकप्रतिनिधी यांचे सहकार्य घेण्यात येत आहे. जिल्ह्यात 10 हजार वनराई बंधारे बांधण्याचे उद्दीष्ट आहे.

वनराई बंधाऱ्यातील पाण्याचा उपयोग पिण्याच्या पाण्याकरिता, जनावरांना, भाजीपाला आणि कडधान्य यासारख्या पिकांसाठी होतो. सिमेंटच्या रिकाम्या गोण्यामध्ये रेती, वाळू भरून आणि त्यांची तोंडे शिवून बंधाऱ्यासाठी वापरता येतात. बंधाऱ्याची उंची दीड मीटरपेक्षा अधिक नसावी. नागरिक आणि विविध संस्थांनी या मोहिमेत सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पुणे यांनी केले आहे.

See also  तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले दर्शन