प्रफुल्ल पटेल यांनी केलेले दावे धादांत खोटे; त्यांच्या आमदारांमध्ये प्रचंड स्वस्थता – आमदार जितेंद्र आव्हाड

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रतोद व नेते आ. जितेंद्र आव्हाड यांनी आज बलार्ड इस्टेट येथील नवीन राष्ट्रवादी भवन कार्यालयात पत्रकार परिषदेला संबोधित केले. यावेळी काल अजित पवार गटाकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतील सर्व धादांत खोटे दावे कायदेशीररीत्या तथ्य सांगून आ. जितेंद्र आव्हाड यांनी खोडून काढले.

यावेळी त्यांनी सांगितले की, काल प्रफुल्ल पटेलांनी जी पत्रकार परिषद घेतली त्याच्यात जे काही मुद्दे मांडले, त्यानुसार त्यांनी दावा केला की, एनडीएमध्ये सामील होण्यासंदर्भात आम्ही पत्र दिले, पण ते पत्र त्यांना कुठे मिळाले हे त्यांनी पत्रकार परिषदेत काही सांगितलेले नाही. माझ्याकडे असणाऱ्या पत्रानुसार नागालँडमधील सदस्यांनी नागालँडचे मुख्यमंत्री रिओ जे नॅशनलीस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी या वेगळ्या पार्टीचे आहेत, या पक्षाला समर्थन देण्यासाठी आणि त्या पक्षाच्या सरकारला पाठिंबा देण्यासाठी परवानगी मागितली होती. त्यांनी भाजप, एनडीए अशा कुठल्याच पक्षाला समर्थन देण्यासाठी परवानगी घेत आहोत असे कुठेच वास्तवात लिखीत स्वरुपात सांगितले नाही. त्यामुळे जे काही सांगण्यात आले ते लोकांना भ्रमित करण्यासाठी सांगण्यात आले आहे.

त्यांच्या आमदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. वकील स्पष्टपणाने सांगत आहेत की, शिवसेनेच्या जजमेंटनुसार अनेक गोष्टी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या क्लीअर झाल्या आहेत, लेजीसलेटीव्ह पार्टीलाच प्रमाण मानून तुम्ही जर निर्णय घेणार असाल तर केंद्रीय निवडणूक आयोगाचा दृष्टीकोनच चुकीचा आहे. त्यांनी सांगितलंय की, संघटनात्मक प्रक्रीयेचाही विचार केला पाहिजे आणि कालची पत्रकार परिषद घेणाऱ्यांना माहिती आहे की, संघटनात्मक सपोर्टची गोष्टच त्यांच्याकडे नाही. पूर्ण संघटनात्मक सपोर्ट हा माननीय पवार साहेबांकडेच आहे. शेवटचे जजमेंट हे प्रमाण मानले जाते, शिवसेनेच्या शेवटच्या जजमेंटमध्ये काही परिच्छेदात उल्लेख आहे की, लेजीसलेटीव्ह पार्टी म्हणजे राजकीय पक्ष नव्हे, राजकीय पक्षाचा एक छोटासा भाग हा विधायक मंडळ असतो.

त्यांच्या प्रारंभिक बैठकाच कधी झाल्या नाहीत, त्यांच्या सोशल मिडीयावर तसे कुठेच नमूद केलेले नाही. सगळी प्रक्रिया राबवण्यासाठी एक चीफ रिर्टनींग अधिकारी लागतो, मी त्यांना आव्हान देतो की, त्यांनी संपूर्ण प्रक्रियेचा चीफ रिर्टनींग अधिकारी कोण होता हे सांगावे. आम्ही पूर्ण प्रक्रीया राबवलेली आहे. ३ ऑगस्ट २०२२ ला परिपत्रक काढले आणि सर्व राज्यांना पाठवले तेव्हा आमचे रिर्टनींग अधिकारी टी. पितांबरम मास्तर हे होते.

आम्ही फक्त एक अधिवेशन बोलावले नव्हते तरी त्या अगोदरपासूनच ही सर्व प्रक्रीया सुरु होती. त्यांना संविधान माहीतच नसून, आपण सर्वांनी हे अधिकार अध्यक्षांना दिलेले आहेत. आमच्याकडे सर्व रेकाॅर्ड असून आम्ही ते जनतेसमोर ठेवलेले आहेत. त्यांना हे माहित आहे की, संघटनेमध्ये त्यांना कुठला पाठिंबा मिळालेला नाही. म्हणूनच ते लेजिसलेटिव्ह चेक करायला सारखे सांगत आहेत. त्यांचे स्वप्न आहे की, आम्ही एनडीए बरोबर आहोत. ते स्वप्न ते अनेक वर्ष बघत आहेत. पण असं आम्ही कुठेच म्हंटलेलं नाही की आम्ही एनडीएसोबत जाणार आहोत. आमच्या तर्फे अधिकृतरीत्या जे पदाधिकारी म्हणून नेमण्यात आले होते त्या ९५% लोकांनी आपला पाठिंबा ॲफीडेव्हीटद्वारे पवार साहेबांना दिलेला आहे. कालची पत्रकार परिषद ही खोट्याच्या आधारावर होती त्यात तथ्य काहीच नव्हते, अशी माहिती आ. जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांना दिली.

See also  संजय राऊतला वेड्याच्या इस्पितळात भरती करणार- शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे