आरक्षण व राजर्षी शाहू महाराज;लेखन अनिल नरके (प्रा. हरी नरके यांचे पुतणे).   

२६ जुलै १९०२ म्हणजे आजपासून १२१ वर्षांपूर्वी राजर्षी शाहू महाराजांनी महात्मा फुले यांच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कोल्हापूर संस्थानांमध्ये मागासवर्गीयांना ५०% टक्के जागा आरक्षित म्हणजे राखीव ठेवण्याचा आदेश काढला. त्या काळात शिक्षणावरती मक्तेदारी फक्त ब्राह्मण समाजाचीच होती. त्यामुळे नोकरी त्यांनाच मिळे.प्रत्येक क्षेत्रातील वर्चस्व मुळापासून मोडून काढण्यासाठी विचारपूर्वक महाराजांनी हा निर्णय घेतला होता. राजांच्या मधला ऋषी म्हणून राजर्षी ही पदवी शाहू महाराजांना कानपूरच्या कुर्मी समाजाने दिली महाराष्ट्रात काही लोक राजश्री असा चुकीचा उल्लेख करताना आजही दिसतात.

सध्याच्या काळात आरक्षण गरिबांना मिळाले पाहिजे असे अनेक जण म्हणतात. मूळतः आरक्षण गरिबी हटवण्याचा मार्ग नाही. आरक्षण हे प्रतिनिधित्व आहे जेव्हा एखादा व्यक्ती विशिष्ट ठिकाणी पोहोचू शकत नाही तेव्हा त्याच्यासाठी वेगळा मार्ग ठेवणे म्हणजे आरक्षण आहे. राजर्षी शाहू महाराजांनी आरक्षण समजावून सांगण्यासाठी एक गोष्ट सांगितली ती आपण समजावून घेऊ समजा दहा घोड्यांपैकी एक घोडा पायामध्ये जखमी आहे दहा घोड्यांच्या वाट्याचे खाद्य समोर ठेवून त्यांना एकाच वेळी सोडण्यात जर आले तर नऊ घोडे जाऊन सर्व खाद्य फस्त करतील. पण जो घोडा पायामध्ये जखमी आहे तो जेव्हा त्या ठिकाणी पोहोचेल तेव्हा त्या ठिकाणचा सगळा तोबरा संपलेला असेल. शाहू महाराजांनी या गोष्टीतून हे समोर प्रात्यक्षिक दाखवून असे विचारले की यावर काय उपाय करता येईल तेव्हा त्यांच्या सोबतचे मित्र त्यांना असे म्हणाले की यासाठी जखमी घोड्यांची वेगळे सोय करावी लागेल आणि या एका घोड्याची वेगळी सोय करावी लागेल. त्याच्या वाट्याचं वेगळं काढून ठेवलं पाहिजे तेव्हा यांची वाटणी समान होईल शाहू महाराज यांनी त्या मित्रांना सांगितले की यासाठी मी हे आरक्षण म्हणजेच वेगळे काढून ठेवले आहे. प्रा. हरी नरके सर आरक्षण समजावून सांगताना एका आईचे उदाहरण देत. आईला दोन मुले असतात. आई कामाला जात असते. जाताना स्वयंपाक करून ठेवते एकत्र ठेवलेला स्वयंपाक थोरला मुलगा येतो आणि तो 70 80 टक्के स्वतः खाऊन टाकतो. धाकटा उशिरा येतो आणि त्याच्या वाट्याला 30 टक्के स्वयंपाक शिल्लक असतो आईला तक्रार करतो आई थोरलेला समजावून कंटाळते व एक उपाय शोधते बाजारात जाते आणि दोन डबे विकत आणते आणि त्या दोन डब्यामध्ये दोघांना लागणार अन्न स्वतंत्र भरून ठेवते ज्याच्या ज्याच्या वाट्याचं त्याला त्याला मिळतं म्हणजेच आरक्षण होय. आरक्षण हे वाट्याचे व हक्काचेच असते . हे कोणावर तरी उपकार केल्याच्या भावनेमध्ये सध्या समाज आहे तसा आरक्षणाचा मूलतः उद्देश नाही. राजर्षी शाहू महाराजांनी 50% आरक्षण दिले यामागे वेदोक्त्याचा इतिहास आहे.राजर्षी राजाची संकल्पना मांडताना म्हणतात की तो उपभोग शून्य स्वामी असला पाहिजे रंजल्या गांजल्यांचा गरीब अज्ञानी जनतेचा उद्धार करत असला पाहिजे.अशी जाहीर भूमिका स्वतः राजर्षी यांनी मांडलेले आहे. १८९४ ला राज्य रोहन झाले तेव्हा कोल्हापूर दरबारातील स्थिती अशी होती की ७१ सरकारी अधिकारी काम करत होते त्यापैकी 60 ब्राह्मण होते. खाजगी ५२ अधिकाऱ्यांपैकी 45 ब्राह्मण होते या काळात शिकलेल्या शंभर लोकांमध्ये ८०% लोक असत . ब्राह्मण समाजाची प्रशासनात मुजोरी वाढलेली होती. म्हणूनच नवीन भरल्या जाणाऱ्या जागा राजर्षीनी आरक्षित केल्या.वेदोक्ताचे प्रकरणांमध्ये प्रचंड विरोध झाला ब्राह्मणांची बाजू लोकमान्य टिळक यांनी घेतली स्वतःच्या दोन्ही वृत्तपत्रांमधून समर्थन केले वेदोक्ताच्या बाजूने राजर्षींच्या विरोधी भूमिका लोकमान्य टिळकांनी घेतली या सर्वांचा परिपाक राजर्षीच्या धोरणात्मक बदलाकडे झाला आणि त्यांच्याकडे ते अधिकार होते.त्यांनी आरक्षण दिले लोकमान्य टिळक गेल्यावर मात्र राजर्षी म्हणतात की माझा थोर शत्रू नाहीसा झाला आता मी कोणाशी लढावेअसे उद्गार त्यांनी काढलेले होते. आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू छत्रपती आहेत त्यावेळी आरक्षण देण्याचा व आत्ता आरक्षण मागण्याचा उद्देश यामध्ये खूप फरक आहे आरक्षणामुळे सर्व समाजाचे दारिद्र्य नाहीसे होणार आहे हा भाबडा भ्रम राजकारणी लोकांनी मुद्दाम माथ्यात भरलेला आहे राज्यघटनेने दिलेले आरक्षण जर गरिबांची योजना असतील तर फक्त गरीब लोकांना आरक्षण दिलेल असतं. त्यांना जागा आरक्षित केल्या असत्या. आरक्षण हे संपूर्ण समाजाची आर्थिक स्थिती बदलासाठी नाही त्यासाठी राज्याने वेगळ्या योजना केल्या पाहिजेत त्याचा सर्व जातींना व विशिष्ट जातीतील सर्वांना फायदा होईल. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जातीय तेढ वाढवला जातोय. राजकारणाची पोळी भाजण्यासाठी हा उद्योग आहे. तो राजकारण्याने बंद केला पाहिजे.सध्याचे वातावरण धर्मभेद व जातीभेद वाढवणारे वाटते. समाजसुधारकांचा सर्व समाज एक आहे या विचारांचे पुनर्जीवन करावं की काय असं सध्याचं वातावरण आहे. न्यायाची खरी रीती महात्मा जोतिराव फुले यांनी सांगितली ती स्वीकारावी लागेल. सर्वात जास्त जागा खाजगी क्षेत्रात असतात तेथे मात्र कोणीच आरक्षण मागताना दिसत नाही.

See also  डासांची उत्पत्ती रोखुया, हिवतापाचे निर्मुलन करूया

राजर्षी असते तर मला स्वतःला असं वाटतं त्यांनी खाजगी क्षेत्रातील जागा आरक्षित करण्याचा आदेश काढला असता.प्रत्येक जातीतील श्रीमंत लोकांना आरक्षणाचा लाभ न मिळण्याची किंवा प्रत्येक जातीतील फक्त श्रीमंतांना आरक्षण मिळत असेल तर त्यावर एकूणच जागांचे चार भाग करून न्याय देता येईल. एकूणच राजर्षी यांचा आरक्षणाचा हेतू मूळ हेतू सध्या बदलवला जात आहे. सामाजिक न्यायासाठी आरक्षण अजून काही काळ आवश्यक आहे. जनगणना होऊन संख्या जातीय निहाय जाहीर सरकार करीत नाही. याकडे सर्व समाजाने लक्ष वेधले पाहिजे. खुल्या 50 टक्के जागा सर्वांसाठी असतात म्हणून लढण्याची व स्पर्धा करण्याची प्रेरणा अबाधित राहत. गुणवत्ता ही निसर्ग दत्त नसते म्हणून आरक्षण हे फक्त कोणताही कोर्सच्या प्रवेशालाच असतं. पास होण्यासाठी कोणतेही आरक्षण नसतं. एकूणच मूळ उद्देशाला धक्का न लागता ज्यांना आरक्षण मागायचे अधिकार आहे त्यांनी ते आवश्य मागाव.मागताना जातीयवाद वाढणार नाही इतरांचा द्वेष केला जाणार नाही ह्या गोष्टी मात्र लक्षात ठेवल्या पाहिजे. राज्यघटना व उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय सर्वच जन मानतात ना मग बाहेर जातीची भांडण जाळपोळ द्वेष माझ्या समाजालाच मिळावं इतरांना मिळू नये इतरांना मिळालेले काढून घ्या ही सामाजिक न्यायाचा न्यायाची भाषा नाही सामाजिक न्याय व्हावा म्हणून आरक्षण देणारे राजे राजर्षी शाहू छत्रपती कोठे आणि आत्ताचे स्वतःची ढेरी वाढविण्यासाठी पुढे आलेले पुढारी कोठे……….. अनिल नरके (प्रा हरी नरके यांचे पुतणे)