‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमाला तेच लोक विरोध करत आहेत ज्यांनी सावित्रीमाई फुलेंवर दगड व शेणाचे गोळे फेकले:- कन्हैयाकुमार; राहुल गांधींचा उद्या पुण्यात सावित्रीबाईंच्या लेकींशी संवाद.

मुंबई/पुणे : मुलींच्या शिक्षणासाठी देशातील सर्वात पहिली शाळा ज्या पुण्यात सावित्रीमाई फुले यांनी सुरु केली त्याच पुण्यात सावित्रीच्या लेकींशी संवाद साधण्यासाठी विरोधी पक्षनेते राहुल गांधी उद्या २२ ऑगस्टला येत आहेत. राहुल गांधींचा भाजपाने एवढा धसका घेतला आहे की ते कार्यक्रमात आडकाठी आणत आहेत, हे तेच लोक आहेत ज्यांनी सावित्रीमाईंवर शेण व दगडगोटे फेकले. पण भाजपाने कितीही अडवणूक केली, अपप्रचार केला तरीही ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रम मोठ्या प्रमाणात यशस्वी होणार, असे काँग्रेस नेते कन्हैयाकुमार यांनी म्हटले आहे.

पुण्यात ‘छात्रों की गुंज’ हा कार्यक्रम २२ ऑगस्ट रोजी होत असून राहुल गांधी विद्यार्थीनींशी संवाद साधणार आहेत, या पार्श्वभूमीवर पुण्यातील पत्रकार परिषदेत कन्हैयाकुमार बोलत होते. भाजपा सरकारच्या शैक्षणिक धोरणावर तोफ डागत ते पुढे म्हणाले की, मनुवादी विचाराने देशातील शिक्षण व्यवस्था बरबाद केली आहे. देशात दर एक तासाला दोन जवान आत्महत्या करत आहेत, २५ शाळा बंद होत आहेत, अभियांत्रिकी महाविद्यालये बंद पडत आहेत. ‘ना पढे है, ना पढने देंगे’, असे यांचे धोरण असून यांचे पदवी प्रमाणपत्रही नकली आहे. भाजपा नेत्यांची मुले परदेशात जाऊन शिक्षण घेत आहेत म्हणून त्यांना फरक पडत नाही. आज शिक्षण महागडे झाले आहे, ते सर्वसामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर गेले आहे. पदवीसाठी ३० लाख रुपये खर्च करावे लागत असतील आणि ८० कोटी जनता ५ किलो धान्यावर जगत असेल तर त्यांना हे महागडे शिक्षण कसे परवडणार? खाजगी शाळांना आमचा विरोध नाही पण सरकारी शाळा बंद होता कामा नये. महागडे शिक्षण घेऊनही नोकरीची शाश्वस्ती नाही. परिक्षांचे पेपर फुटत आहेत, या सरकारला दहावीची परिक्षासुद्धा घेता नाहीत. CBSE च्या परिक्षेतही घोटाळा झाला. शिक्षण आमचा अधिकार आहे तो विषेशाधिकार बनवला जात आहे, असे कन्हैयाकुमार म्हणाले.

पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना कन्हैयाकुमार म्हणाले की, राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमाचा भाजपाने धसका घेतला आहे. कोटापासून सुरु झालेला कार्यक्रम प्रत्येकवेळी अडवण्याचा, त्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला पण हे सर्व कार्यक्रम यशस्वी झाले. पुण्यातही परवानगी देताना अनेक अटी घालण्यात आल्या आहेत पण अशा प्रयत्नाने कार्यक्रम थांबणार नाही तो मोठ्या प्रमाणात यशस्वी होणार यात शंका नाही. सोशल मीडियावर भाजपाने एक VDO अपलोड करून ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमाबद्दल अपप्रचार सुरु केला आहे पण या कार्यक्रमाला पैसे देऊन कोणाला आणण्याची गरज नाही, ते स्वतः येत आहेत. कितीही अडथळा आणला तरी राहुल गांधी येणार आणि कार्यक्रमही होणारच. राहुल गांधी अमित शाह यांच्यासमोर झुकले नाहीत तर फडणवीस यांच्यासमोर कशाला झुकतील? असेही कन्हैयाकुमार म्हणाले.

See also  पाच टक्के कॅन्सर मोबाईलमुळे वैज्ञानिकांचा शोध -पद्मश्री डॅा. तात्याराव लहाणे

या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते.