येत्या जूनपासून ई-पंचनामे करण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळणार – मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे

पंचनाम्याच्या सर्वेक्षणासाठी उपग्रह आणि डोनची मदत घेण्यात येणार

मुंबई : नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेळेत व्हावेत, पंचनाम्याबद्दल शेतकऱ्यांच्या तक्रारी येऊ नयेत यासाठी येत्या जूनपासनू ई – पंचनामे करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह आज विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांची एक दिवसीय परिषद आयोजित करण्यात आली होती.

श्री. शिंदे म्हणाले की, येणाऱ्या काळात मानवी हस्तक्षेप टाळून माहिती तंत्रज्ञानाची मदत घेऊन मोबाईलद्वारे ई -पंचनामा करण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना पारदर्शक पध्दतीने आणि तातडीने मदत मिळावी याकरिता सर्वेक्षणासाठी उपग्रह आणि ड्रोनची मदत घेऊन संगणकीय प्रणाली वापरण्यात येणार आहे. प्रधानमंत्री कृषि सन्मान योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी “नमो शेतकरी महासन्मान निधी” योजना आणण्यात आली आहे. तर प्रधानमंत्री पिक विमा योजनेत आता शेतकऱ्यांना केवळ 1 रुपया भरुन प्रधानमंत्री पीक विम्याच्या पोर्टलवर नोंदणी करता येणार आहे.

गेल्या काही वर्षांपासून सतत होणारा हवामानबदल, अवकाळी, गारपीट आणि अवर्षण अशा असंख्य समस्यांनी शेतकरी ग्रासला आहे. शाश्वत शेतीसाठी अनेक उपाय होत असले तरी शेतकऱ्यांना शासनाकडून हक्काच्या मदतीची गरज असते. नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेळेत व्हावेत यासाठी माहिती आधुनिक तंत्रज्ञानाची मदत यावर्षापासून घेण्यात येत आहे. शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमध्ये देण्यात येणाऱ्या मदतीत वाढ करण्यात आली असून आता एसडीआरएफच्या दुप्पट दराने शेतकऱ्यांना मदत करण्यात आली आहे. याशिवाय राज्य आपत्ती प्रतिसाद निधीकडून (एसडीआरएफ) द्यावयाच्या मदतीचे वाढीव दर लागू करण्याबरोबरच आता 3 हेक्टर मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांना मदत देण्यात येत आहे.आपले शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांना आधार देणे हेच आपले कर्तव्य आहे. जून महिना सुरु झाला की वीज पडून होणारे मृत्यू आणि तीव्र उष्णतेमुळे होणारे मृत्यू हे सर्व टाळण्यासाठी आपण सर्वांनी आवश्यक ती खबरदारी आपल्या विभाग आणि जिल्हयांमध्ये घ्यावी अशा सूचनाही श्री. शिंदे यांनी यावेळी दिल्या.

See also  मनोहर भिडेंवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा. - अरविंद शिंदे,अध्यक्ष-पुणेशहर काँग्रेस

या परिषदेत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या काही दिवसात वातावरणात वाढलेली तीव्र उष्णता, गारपीट, अवकाळी पाऊस यामुळे शेतकऱ्यांचे होत असेलेल नुकसान हे अत्यंत महत्वाचे विषया आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांचे बरेच नुकसान झाले आहे. राज्यातील शेतकऱ्यांना आधार देणे, त्यांच्या पाठीशी उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे.मदत व पुनर्वसन विभागाकडून तातडीने पंचनामे करण्यात आले आहेत.येणाऱ्या काळातही आपण सर्वांनी दक्ष राहून आवश्यक ती खबरदारी घेऊन आपले काम जवाबदारीने करावे असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

दिवसभर चालणाऱ्या या राज्यस्तरीय परिषदेत महत्त्वाचे विषय तसेच फ्लॅगशिप योजनांवर विचारमंथन करण्यात आले. उष्णतेची लाट, नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, प्रधानमंत्री कृषि सन्मान योजना 2.0, जलयुक्त शिवार, ई-ऑफिस, आकांक्षित शहरे आदी विषयांवर सादरीकरण करण्यात येऊन चर्चा करण्यात येणार आहे. याच परिषदेत मिशन-2025 अंतर्गत मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना 2.0 चे लोकार्पण देखील करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडून मुख्य सचिव यांचा कार्यगौरव सन्मान
राज्याचे मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव नियत वयोमानानुसार येत्या 30 एप्रिल 2023 रोजी निवृत्त होत आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य सचिव यांचा कार्यगौरव करीत विशेष सत्कार केला. शासन आणि प्रशासनात दुवा म्हणून काम करत केंद्र शासनाच्या योजना राज्यात गतीशील करण्यासाठी तसेच राज्य शासनाचा कारभार अधिक लोकाभिमुख करण्यासाठी त्यांच्या सहभागासाठी मुख्य सचिव श्री. श्रीवास्तव यांचा सत्कार केला.

या एक दिवसीय परिषदेला मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्री महोदयांचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, मृद व जलसंधारण विभागाचे अपर मुख्य सचिव नंद कुमार, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर,ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असिम कुमार गुप्ता उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, उपमुख्यमंत्री महोदयांचे सचिव डॉ. श्रीकर परदेसी यांच्यासह सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.

See also  पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे- जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

सकाळच्या सत्रात मृद व जलसंधारण विभागाचे अपर मुख्य सचिव नंद कुमार, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असिम कुमार गुप्ता, पाणी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव नवीनकुमार सोना यांनी येत्या काळात राज्य शासनाच्या संबंधित विभागामार्फत विविध समस्यांबाबत करण्यात येणाऱ्या उपाययोजना याबाबतचे सादरीकरण केले.