मुंबई : महाराष्ट्र शासनाने नाथपंथीय समाजासाठी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला. यामुळे खऱ्या अर्थाने मुख्य प्रवाहापासून दूर असणाऱ्या नाथपंथीय समाजाच्या विकासाला चालना मिळेल आणि आर्थिक उन्नती साधण्याचा मार्ग सुकर होईल. त्यामुळे या निर्णयाचे स्वागत करून राज्य शासनाचे अखिल भारतीय नाथपंथीय समाज महासंघाने अभिनंदन केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राज्यात या समाजाला खऱ्या अर्थाने न्याय देण्याची भूमिका घेतली आहे. महासंघाच्या माध्यमातून सातत्याने नाथपंथीय समाजाच्या विकासासाठी राज्य शासनाने पावले उचलावीत, यासाठी पाठपुरावा करण्यात येत होता. या प्रयत्नाला यश येऊन राज्य शासनाने अतिशय सकारात्मक भूमिका घेऊन समाजाला न्याय दिल्याची भावना महासंघाने व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रातून देशभर पसरलेल्या नाथपंथीय समाजाची पारंपरिक चरितार्थाच्या साधनांअभावी अलिकडच्या काळात फारच दुरवस्था झालेली आहे. शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प असल्याने आणि पारंपरिक व्यवसाय बंद पडत चालल्याने हा समाज आर्थिकदृष्ट्या कमकुवत राहिला. समाजाची उन्नती घडून यावी याकरिता महासंघाच्या माध्यमातून मागील १४ वर्षांपासून नाथपंथीय समाज महामंडळाच्या स्थापनेची मागणी विविध पातळ्यांवर लावून धरण्यात येत होती. त्याला या विद्यमान महायुती सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिल्याची प्रतिक्रिया महासंघाच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली.
या प्रयत्नांमध्ये गृहनिर्माण व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, माजी मंत्री आमदार गणेश नाईक, आमदार श्रीकांत भारतीय आणि भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री विजयराव चौधरी यांचे बहुमोल मार्गदर्शन व सहकार्य लाभले. या सर्वांचेही महासंघाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
महामंडळाच्या स्थापनेमुळे कौशल्य विकास, शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण आदी संदर्भातील तरुणांसाठीच्या विविध योजनांना चालना देऊन आधुनिक काळाची आव्हाने पेलण्याकरिता समाजाला आर्थिक व शैक्षणिक उन्नतीच्या दृष्टीने सक्षम करण्याच्या प्रयत्नांना बळ मिळेल , असा विश्वास महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ जयाजी नाथ, प्रदेशाध्यक्ष दिगंबर डवरी, राष्ट्रीय महासचिव विश्वनाथ नाथ, प्रवक्ते प्रा. सुनील जाधव, प्रदेश सचिव योगेश बर्वे आणि श्री. गोरख वंजारी यांनी व्यक्त केला आहे.