बाणेर येथे कचरा प्रकल्पा विरोधात भर पावसात मानवी साखळी करून नागरिकांचे आंदोलन; पालिकेने रस्ता नसताना उभारला प्रकल्प

बाणेर : बाणेर सर्वे नंबर 48/2/1 मधील पुणे महानगरपालिकेने उभारलेल्या कचरा प्रक्रिया प्रकल्प विरोधात सुस रोड बाणेर विकास मंच च्या वतीने भर पावसात मानवी साखळी करून शेकडो नागरिकांनी पुणे महानगरपालिकेच्या गलथान कारभाराचा निषेध व्यक्त केला.

पुणे महानगरपालिकेने 2016साली बाणेर येथील कीर्ती गार्डन टेकडी जवळ कचरा प्रकल्प उभारला होता. रस्ता नसताना तसेच रस्त्याची जागा ताब्यात नसताना पुणे महानगरपालिकेने बेकायदेशीर प्रकल्प उभारला. या प्रकल्पाबाबत परिसरात दुर्गंधी निर्माण होत असल्याने नागरिकांनी सुप्रीम कोर्टापर्यंत कायदेशीर लढा दिला. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे प्लांट चालवला जात नसल्याने हा प्लांट स्थलांतरित करण्याची मागणी परिसरातील सोसायट्या व नागरिकांकडून केली जात आहे.

जागा ताब्यात नसताना त्यावर कोट्यावधी रुपयांचा खर्च करून काँक्रीट रस्ता देखील करण्यात आला आहे. या विरोधात सुस रोड बाणेर विकास मंचच्या वतीने मानवी साखळी करून आंदोलन करण्यात आले. यावेळी नागरिकांनी पालिकेचा निषेध व्यक्त केला. या आंदोलनात बाणेर बालेवाडी पाषाण सुस परिसरातील नागरिक महिला, लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांसह सहभागी झाले होते.

यावेळी सुस रोड बाणेर विकास मंचचे विनायक देशपांडे, हरीश पाटील, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर, बाळासाहेब भांडे, गणेश तापकीर, ॲड.सत्या मुळे, पुष्कर कुलकर्णी, शैलेंद्र पटेल, सतीश पाषाणकर, राशिनकर, मोहोळकर आदी उपस्थित होते.

पालिका कचरा प्रकल्प बाबत सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाचे पालन न करता वारंवार अवमान करीत आहे. कचरा प्रकल्प स्थलांतरित करण्यासाठी नागरिक मागणी करत असताना देखील अधिकारी कारवाई करत नाहीत ही बाब खेद जनक आहे असे विनय देशपांडे यांनी यावेळी सांगितले.

माजी नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर म्हणाले, कचरा प्रकल्पासाठी रस्त्याला जागा ताब्यात दिली नसताना देखील प्रकल्प उभारण्यात आला आहे. पालिका बेकायदेशीर कामे कसे करू शकते. याबाबत मला कोणताही मोबदला देण्यात आलेला नाही जागेचा गैरवापर करण्यात आला असल्याने हा प्रकल्प तातडीने बंद करावा तसेच माझ्या जागेचा रस्त्याचा गैरवापर बंद करावा.

See also  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत गणेशोत्सव नियोजन बैठकीचे आयोजन

उपायुक्त संदीप कदम म्हणाले, ज्ञानेश्वर तापकीर यांना जागा ताब्यात देण्यासंदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला असून मालमत्ता व्यवस्थापन विभागाला देखील याबाबत पत्रव्यवहाराद्वारे सूचित करण्यात आले आहे. प्रकल्पाचा त्रास नागरिकांना होणार नाही याची काळजी घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. पालिकेने जागा ताब्यात असल्याप्रमाणे उभारला आहे. हा प्रकल्प नऊ वर्षापासून सुरू आहे.