काँग्रेस हा सर्वसामान्यांचा पक्ष; कामांची चौकशी करा, मगच मतदान करा – तानाजी निम्हण यांचे महाळुंगेकरांना आवाहन

बाणेर : काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्य नागरिकांचा पक्ष असून, जनतेच्या अडचणी सोडवण्याचे काम यापूर्वीही केले आहे आणि आजही करत आहे, असे प्रतिपादन माजी नगरसेवक तानाजी निम्हण यांनी महाळुंगे परिसरातील नागरिकांशी संवाद साधताना केले. थेट जनसंवादातून त्यांनी नागरिकांच्या प्रश्नांना उत्तर देत काँग्रेसच्या विकासकामांचा आढावा मांडला.

यावेळी बोलताना तानाजी निम्हण म्हणाले की, “चुकीचे धंदे आणि व्यवसाय करणारे लोक भाजपकडे जात आहेत. मात्र मी कधीही मतदारांचा घात करणार नाही किंवा त्यांची फसवणूक करणार नाही. मतदान करण्यापूर्वी तुम्ही माझी चौकशी करा. मी नगरसेवक असताना चांगली कामे केली आहेत का, याची खात्री करून घ्या आणि मगच मतदान करा,” असे स्पष्ट आवाहन त्यांनी नागरिकांना केले.

या संवादादरम्यान राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेच्या कालावधीत बाणेर–बालेवाडी–महाळुंगे–पाषाण परिसरात झालेल्या विकासकामांची माहिती देण्यात आली. यामध्ये रस्त्यांचे काम, पाण्याच्या टाक्यांची उभारणी, पाषाण टेकडीवरील विकासकामे, महाळुंगे–बालेवाडी क्रीडा नगरी, तसेच सुस रस्ता या महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे.

या कार्यक्रमाला काँग्रेस पक्षाच्या स्वाती सूर्यवंशी, गणेश मोरे, ज्येष्ठ कार्यकर्ते मधुसूदन पाडाळे, मिना निम्हण, स्वाती निम्हण, जगदीश ढोले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. नागरिकांशी थेट संवाद, केलेल्या कामांचा लेखाजोखा आणि स्पष्ट भूमिका यामुळे या भेटीला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.

See also  पुणे शहरात प्रदूषण करणाऱ्या 700 आस्थापनांवर दीड वर्षापासून कारवाई नाही; कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची राम बोरकर यांची मागणी