‘मन की बात’च्या शतकीय संवादाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

कोथरूड : देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचा शतकीय भाग सामूहिकरीत्या पाहण्याची व्यवस्था कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे करण्यात आली होती.
यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पुणेकरांच्या तसेच कलाकारांसमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला केलेले मार्गदर्शन ऐकले.

पंतप्रधान मोदीजींनी ‘मन की बात’च्या प्रत्येक भागात देशाला संबोधित करताना विविध विचार दिले. ज्याचे नंतर शब्दशः चळवळीत रुपांतर झाले. देशाला नव्याने दिशा मिळाली. हेच प्रेरणादायी विचार एकत्रितपणे नागरिकांपर्यंत पोहोचावेत, या उद्देशाने नाट्यगृहाच्या परिसरात ९९ भागांची प्रदर्शनी भरवण्यात आली, ज्याचे उद्धाटन ‘मन की बात’ संवादापूर्वी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आणि भाजपा प्रदेश कार्यालय प्रभारी रविंद्र अनासपुरे यांच्या उपस्थित करण्यात आले.

त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित ‘महानायक सावरकर’ ही अनोखी सांगीतिक मैफल राहुल देशपांडे, सावनी रवींद्र, प्रसनजीत कोसंबी या दिग्गज कलाकारांनी सादर केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजवरच्या ‘मन की बात’ संवादात उल्लेख केलेल्या पुण्यातील व्यक्तींचा सन्मानही यावेळी करण्यात आला. यात सीओईपीचे कुलगुरु सुधीर आगाशे, प्रयोगशील शेतकरी राजेश माने, बॅाक्सिंग खेळाडू आणि प्रशिक्षक आकाश गोरखा, कोरोना संकटकाळात आरोग्यसेवा सक्षमपणे पुरवणारे डॅा. रोहिदास बोरसे, ज्ञानप्रबोधिनीचे प्रज्ञा प्रभूदेसाई-अक्कलकोटकर आणि स्वप्निल इंदापूरकर यांचा गौरव केला.

माननीय पंतप्रधानांचा संदेश अगदी तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम तसेच जनतेचा थेट देशाच्या पंतप्रधानांशी संवाद हे केवळ ‘मन की बात’ या कार्यक्रमामुळे शक्य झाले. ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे स्वच्छ अभियानाची घातलेली साद असो, कोरोना काळात लसीकरणाची साद असो, बेटी बचाओ- बेटी पढ़ाओ अभियान असो किंवा मग स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव असो, या सर्वांना देशाच्या जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या कार्यक्रमास कोथरूड परिसरातील विविध सोसायटीचे प्रतिनिधी, नागरिक तसेच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

See also  बाणेर येथील बांधकाम व्यवसायिकाच्या हलगर्जीपणामुळे नऊ वर्षाच्या मुलाचा मृत्यू