पहाटेच्या शपथविधी विषयी ‘लोक माझे सांगाती’ मध्ये काय आहे वाचा

मुंबई : शरद पवार यांच्या राजकीय आत्मचरित्र असलेल्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीचे प्रकाशन झाले.  या पुस्तकांमध्ये त्यांनी राज्यातील झालेले सत्तांतर व अजित पवार यांनी राष्ट्रवादीशी बंड करून पहाटेचा शपथविधी केल्याबद्दलही मोठा खुलासा केला आहे. 

अजित पवार यांनी केलेल्या बंडाला राष्ट्रवादीचा कसलाही पाठिंबा नव्हता, त्यांनी त्यांच्यासोबत काही आमदार घेऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली पण तो प्रयोग यशस्वी ठरला नाही. कारण त्याला राष्ट्रवादी पक्षाचा पाठिंबा नव्हता. त्यानंतर महाविकास आघाडीची स्थापना झाली आणि नवं सरकार स्थापन झालं असा उल्लेख या आत्मचरित्रामध्ये केला आहे.

बंड अयशस्वी झाल्यानंतर अजित पवार जास्त बोलत नव्हते. पण या नाराजीवर पडदा पडणे आवश्यक होता. विषय कौटुंबिक असल्यामुळे शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्याजवळ अजित पवारांनी दिलगिरी व्यक्त केली. “जे घडलं ते चुकीचं झालं, असं घडायला नको होतं.” अशा शब्दांत अजित पवारांनी दिलगिरी व्यक्त केली आणि या वादावर पडदा पडल्याचा उल्लेख या पुस्तकात केला आहे. 

दरम्यान, पहाटेच्या शपथविधी सोहळ्याची चाहूल शरद पवार यांना त्या दिवशी पहाटे ६.३० वाजतात कळाली होती. हा त्यांच्यासाठी खूप मोठा धक्का होता पण ही गोष्ट समजताच त्यांनी उद्धव ठाकरे यांना कॉल केला आणि या बंडाला राष्ट्रवादीचा पाठिंबा नसल्याचं सांगितलं. पण या शपथविधीमुळे महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्यासही मदत झाल्याचं त्यांनी यामध्ये म्हटलं आहे.

See also  महाराष्ट्राचा मॅग्नेट प्रकल्प फुलशेतीसाठी वरदान - अप्पर मुख्य सचिव अनुप कुमार