राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंदांनी लढण्याची प्रेरणा दिली – ना. चंद्रकांतदादा पाटील

पुणे : राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद या दोघांनीही लढण्याची प्रेरणा दिली आणि आज त्यांच्या जयंती दिनी समोर बसलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांकडे बघून ही शिकवण ह्या मुलांनी अंगीकरल्याचे दिसून येते. आपल्या शरीरात काहीतरी व्यंग आहे त्याच्यावर मात करून जिद्दीने जगणाऱ्या ह्या विद्यार्थ्यांना सलाम करतानाच त्यांना मदत करणाऱ्या क्रिएटिव्ह फाउंडेशन, मुकुलमाधव फाउंडेशन आणि ग्लोबल ग्रुप सारख्या संस्थांचे ही मी अभिनंदन करतो आणि समाजाच्या वतीने त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो.असे ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.


मुकुलमाधव फाउंडेशन आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने वानवडीतील दिव्यांग कल्याणकारी केंद्र आणि संशोधन संस्था येथे विद्यार्थ्यांसाठी तब्ब्ल 120 बेंच भेट देण्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी क्रिएटिव्ह फौंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर, फिनोलेक्स चे प्रदीप विदुला (अध्यक्ष सेल्स आणि मार्केटिंग), ग्लोबल ग्रुप चे संचालक मनोज हिंगोरानी,आ. सुनील कांबळे,मुकुलमाधव फाउंडेशन चे जितेंद्र जाधव,फिनोलेक्स चे पृथ्वीराज भागवत काळे,संस्थेचे अध्यक्ष प्रदीप रावत, कार्याध्यक्ष मुरलीधर कचरे, मुख्याध्यापक शिवानी सुतार व इतर मान्यवर उपस्थित होते.

फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले,आहे रे आणि नाही रे यांच्या मधील जे अंतर आहे / दरी आहे त्यावरील सेतू चे काम क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि मुकुलमाधव फाउंडेशन करत असते आणि अनेक कंपन्याचे सी एस आर निधी हे योग्य ठिकाणी पोहोचावे यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो असे .दिव्यांगांना सहानुभूती ची नाही तर मदतीचा हाथ आणि साथ देण्याची गरज असून त्या आधारावर ते सक्षम पणे समाजात उभे राहू शकतात आणि सामान्य माणसाप्रमाणे समाजात जगू शकतात.
मुकुलमाधव फौंडेशन, क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि ग्लोबल ग्रुप हातात हात घालून समाजासाठी काम करतात आणि जेथे जेथे गरज आहे तेथे मदतीचा हात देऊन समाजाप्रती चे कर्तव्य पूर्ण करत असतात असे श्री. प्रदीप विदुला आणि श्री. मनोज हिंगोरानी यांनी आपल्या संबोधनात स्पष्ट केले.
संस्थेचे कार्याध्यक्ष मुरलीधर कचरे यांनी संस्थेच्या कार्याची माहिती देताना येथे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देत असून त्यांना सक्षम करणे आणि स्वतःच्या पायावर उभे करण्याचे कार्य करत असते आणि असे सर्व विषय हे समाजातील दानशूरांवर अवलंबून असते असे सांगितले. ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी दिव्यांग विद्यापीठाच्या स्थापनेत महत्वाची भूमिका निभावली आहे, त्याचा गौरवपूर्ण उल्लेख करून श्री. मुरलीधर कचरे यांनी त्यांचा विशेष सन्मान केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप खर्डेकर यांनी केले, प्रदीपदादा रावत यांनी उपस्थितांचे स्वागत तर मुरलीधर कचरे यांनी समारोप व आभार प्रदर्शन केले. दिव्यांग मुलांनी विविध वेशभूषेत स्वागत गीत व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

See also  विकसित भारत संकल्प यात्रेचा उपक्रम राज्यात प्रभावीपणे राबविण्यात यावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे