पुणे : राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथील जिल्हा नियंत्रण कक्षास भेट देऊन पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. आपत्तीच्या काळात परिस्थितीचे गांभीर्य विचारात घेता तात्काळ उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले. तसेच आपत्तीच्या काळात शासन आणि जिल्हाप्रशासन नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवावर विश्वास ठेवू नये, प्रशासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी आमदार चेतन तुपे, जिल्हा परिषद अध्यक्ष विरधवल जगदाळे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे आदी उपस्थित होते.
श्रीमती पवार म्हणाल्या, भारतीय हवामान विभागाने ४, ५ आणि ६ जुलै २०२६ करिता पुणे जिल्ह्याकरिता रेड अलर्ट दिलेला होता. या काळात ५ जुलै रोजी ४६.९ मि. मी., ६ जुलै रोजी ५९ मि. मी. इतका पाऊस झालेला आहे. त्याचबरोबर ५ व ६ जुलै रोजी एकूण १५८ मंडलापैकी २७ मंडलामध्ये ६५ मि.मी. पेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे. एकूण जिल्ह्यात २ एनडीआरएफ पथक, ४ पीएमआरडीए पथक, ३०० स्थानिक आपदामित्र, ५ स्थानिक संस्था आदी मदत व बचाव कार्यासाठी कार्यरत यंत्रणा आहेत. तसेच राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष, जिल्हा व्यवस्थापन कक्ष, महानगरपालिका, पीएमआरडीए, पोलिस व सर्व शासकीय यंत्रणा यांचे मध्ये समन्वय असून आवश्यक ते सर्व मदतकार्य करत आहे. एकूण ५६८ व्यक्तींना बचावकार्य करुन सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले आहेत. एकूण ९ ठिकाणी छोट्या दरडी कोसळल्या आहेत. ९ ठिकाणी रस्ते बंद करण्यात आले आहेत.
मावळ तालुक्यातील ताजे येथील २५० नागरिकांना आणि मौजे भावडी, कदमवस्ती २७, वडगाव शिंदे ८, तळेगाव दाभाडे ४० ते ५०, घोर वाडी ३०, आंबेठाण, चाकण ८०, सक्सेस पॉइंट सूंबरे नगर २०, लोणावळा १०० ते ११० आणि मौजे पेठ येथील ८ नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे.
जिल्ह्यात घाट माथा परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, राजगड व भोर तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मावळ तालुक्यातील मौजे लोणावळा परिसरात भाजे धबधबा. लोहगड किल्ला, विसापूर किल्ला, तिकोणा किल्ला, तुंग किल्ला, टायगर पॉईट, लायन्स पॉईट पवना डॅम या ठिकाणी ३१ ऑगस्टपर्यंत भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ लागू करण्यात आले आहे.
इंदायणी नदीमध्ये ‘फ्री कॅचमेंट’ मुळे पाण्याचा प्रवाह वाढत असून उद्या श्री. क्षेत्र देहू आणि परवा श्री. क्षेत्र आळंदी येथून पालखी प्रस्थान सोहळा असल्याने वारकऱ्यांना क्षेत्र देहू व श्री. क्षेत्र आळंदी येथे न येता पुणे महानगरपालिका हद्दीत पालखीने प्रवेश केल्यानंतर पालखीत सोहळ्यात सहभागी व्हावे, आपली पुणे महानगर पालिकेच्याशाळेत व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
जिल्ह्यातील जाधववाडी धरण आणि टाटा धरण, लोणावळा १०० टक्के,खडकवासला धरण २०.३० टक्के, वरसगाव धरण २९.६ टक्के,पानशेत धरण ३१.५१ टक्के, टेमघर धरण १४.९९ टक्के, मुळशी धरण३२.१३ टक्के आणि पवना धरण ४८.७५ टक्के पाणी साठा आहे, अशी माहिती श्रीमती पवार यांनी दिली.
श्री. डुडी यांनी जिल्ह्यातील परिस्थितीच्या आढावा दिला. जिल्ह्यातील मयत नागरिकांच्या वारसांना ४ लाख रुपयांची मदत करण्याच्या सूचना श्रीमती पवार यांनी दिल्या.















