भूगाव : भुगाव मधील वाहतूक कोंडी समस्या उद्भवण्यासाठी अनेक कारणे आहेत. त्यातील मुख्य कारण रस्त्यावर असणारे छोटे-मोठे खड्डे आणि या खड्ड्यांमुळे स्वभाविक गाडीचा वेग कमी होतो किंवा खड्डा चुकविण्यासाठी गाडी दुसऱ्या लेन मध्ये येतात. त्यामुळे ट्राफिक होत असल्याचे अनेक निरीक्षणांवरून लक्षात आले, यावर उपाययोजना करण्यासाठी म्हणून प्रशासकीय यंत्रणांची मदत न घेता किंवा त्यांच्याकडून अपेक्षा देखील न करता लोकसेवक अनिल करंजावणे यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा फाउंडेशनचे संस्थापक /अध्यक्ष मा उपसरपंच श्री अक्षय सातपुते, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री अमित घारे, माजी सरपंच बाळासाहेब शेडगे, माजी सैनिक अनिल चोंधे, शाम घारे, युवा नेते कुमार शेडगे, प्रजय सातपुते, सूरज शेडगे, निखिल करंजावणे, किरण कड, रवींद्र शामल, संतोष कसाळ,श्री परळकर आणि मित्र परिवाराने एकत्र येऊन आर एम सी प्लांटची एक संपूर्ण गाडी उपलब्ध केली. व भुगाव मधील असणारे खड्डे बुजविण्याचा प्रयत्न केला.
भूगाव परिसरातील वाहतुकीला अडथळे ठरत असलेले खड्डे तातडीने बुजवण्यात आले. यामुळे खड्ड्यांमुळे वाहतुकीची बंद पडत असलेली लेन सुरू झाली. परिणामी खड्ड्यांमुळे गाड्यांचा वेग कमी होत नव्हता तसेच खड्डा चुकवण्यासाठी कोणी लेन तोडत नव्हते. यामुळे वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ग्रामस्थांनी घेतलेला पुढाकार व शोधलेल्या उपाययोजना याचा उपयोग झाला.
भूगाव तसेच पुणे शहरांमध्ये असलेल्या अनेक गावांमध्ये सध्या वाहतूक कोंडी सातत्याने पाहायला मिळत आहे. अनेक छोट्या उपाययोजना केल्यानंतर हे वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी करणे सहज शक्य आहे. परंतु प्रशासन व वाहतूक विभाग यांच्या समन्वयाचा असलेला अभाव तसेच पीएमआरडीए व पुणे महानगरपालिका अधिकाऱ्यांची असलेली उदासीनता यामुळे सहज सोपे उपाय देखील वाहतूक कोंडीवर केले जात नाहीत.
नागरिकांचा समन्वय साधून प्रशासनाने उपाययोजना केल्यास तातडीने वाहतूक कोंडीवर मोठ्या प्रमाणात उपाय योजना कमी खर्चात होणे शक्य असून यासाठी समन्वय समिती कार्यरत करण्यात यावी अशी मागणी देखील केली जात आहे.
























