वेल्हे परिसरात भात शेतीच्या लागवडीच्या कामाला वेग

वेल्हे : वेल्ह्यामध्ये उशिरा का होईना पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या कामाला वेग आला आहे.
वेल्हे तालुक्यात पाऊस सुरू असल्याने भात शेतीची लागवड केली जात आहे. वेल्हे तालुक्यातील पाबे, माजगाव, पासली, वेल्हे आदी परिसरामध्ये भात लागवड केली जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून पावसामध्ये सातत्य राहिल्याने शेत शिवरात पाणी साचले आहे. भात लागवड ही शेतामध्ये पाणी साचले असतानाच केली जाते. त्यामुळे गुडघाभर पाण्यात शिरुन शेतकरी भात लागवड करीत आहे. अथक परिश्रम असतानाही शेतकऱ्यांचा उत्साह मात्र कायम आहे. शिवाय जुलैच्या अखेरपर्यंत खरिपातील पेरण्या उरकून घेण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. त्यामुळे पावसाने उघडीप दिली की शेती कामे उरकून घेण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे.

पावसामुळे पेरणीसाठी पोषक वातावरणही तयार झाले आहे. भात लागवडीसाठी आवश्यक असलेला पाऊस जिल्ह्यात बरसला असून आता भात लागवडीची कामे जोमात सुरु आहेत. शिवाय पावसामुळे शेतकऱ्यांचा उत्साह दुणावला आहे. सध्या पावसाची उघडझाप होत असल्यामुळे भात लावणीला वेग आला आहे. तर इतर खरीप पिकांनाही जीवदान मिळाले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे पेरणीचे गणित हुकले असले तरी आता उत्पादन वाढीच्या अनुशंगाने शेतकरी प्रयत्न करताना दिसत आहे. गत महिन्यात पेरणी झालेल्या पिकांचा मशागत तर नव्याने भात लागवड ही कामे जोमात सुरु आहेत.

चारसूत्री पध्दतीने लागवड

भाताची लागवड करताना दोन्ही रोपांमधील अंतर 15*25 सेंटीमाटर ते 15*25 असे ठेवावे लागणार आहे. प्रत्येक सरीमध्ये आलटूनपालटून असेच अंतर ठेवणे गरजेचे आहे. भात लागवडीसाठी चिखलणी करताना गिरिपुष्पाची हिरवी पाने मिसळावीत. सुधारित लावणी दोरीवर 15 सें.मी. अंतरावर असलेल्या प्रथम एक व नंतर दुसरा चूड लावावा. अंदाजाने 15 सें.मी. पुढे आणखी तिसरा व चौथा चूड लावावा.

See also  पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते ५ कोटी ७५ लाख रुपयांचा मुद्देमाल नागरिकांना हस्तांतरीत